विधानसभा निकालात भारतीय जनता पक्षाचे अभूतपूर्व यश : डॉ. अशोक जीवतोडे
पश्चिम बंगाल सह इतर राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा चंद्रपुरात जल्लोष
चंद्रपूर:– देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष आज (दि.४) ला स्थानिक नागपूर रोडवर फटाके फोडून, पक्षाचे झेंडे उंचावून व लाडू वाटप करुन जल्लोष करण्यात आला.
देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, आणि पुद्दुचेरी या राज्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक निकालात अभूतपूर्व आघाडी मिळविली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या देशातील बड्या नेत्यांच्या पश्चिम बंगाल व इतर राज्यातील प्रचाराला यश आले असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे. सोबतच या चार राज्यातील विधानसभेत अभूतपूर्व यशाबद्दल त्या-त्या राज्यातील जनतेचे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचे या यशाकरीता डॉ. जीवतोडे यांनी अभिनंदन केले.
डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागपूर रोडवर फटाक्यांची आतिषबाजी करुन, पक्षाचे झेंडे उंचावून, लाडू वाटप करुन जल्लोष करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक देवानंद वाढई, आनंद चकीनारपवार, दिलीप कार्लेवार, संदीप देशपांडे, अजय ढिमोले, प्रकाश घाटे, रवि जोगी, मंगेश अहिरकर, आबाजी बाविस्कर, सचिन दिघाडे, मेहता व आदी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





